विधीमंडळातील पहिल्याच भाषणात रोहित पाटील यांनी आपली छाप सोडली..

विधीमंडळातील पहिल्याच भाषणात रोहित पाटील यांनी आपली छाप सोडली..

मुंबई: यंदाच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांनी आपल्या पहिल्याच भाषणात प्रभावी फटकेबाजी करत छाप पाडली. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना पाटलांनी आपल्या तरुण वयाचा उल्लेख करत विधानसभेतील ज्येष्ठ सदस्यांचे लक्ष वेधून घेतले.

लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित करत बाबासाहेबांचा उल्लेख:
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला रोहित पाटील यांनी भारतातील लोकशाहीची वैशिष्ट्ये मांडली. "बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एका मताच्या अधिकाराने आम्ही सगळे येथे बसलो आहोत," असे सांगत त्यांनी देशातील लोकशाही व्यवस्थेचं महत्त्व अधोरेखित केलं.

नार्वेकर यांना दिल्लीत पाठवण्याची 'चिमटा फेक':
आपल्या भाषणात पाटील म्हणाले, "तुम्ही सगळ्यात तरुण अध्यक्ष आहात, आणि मी सगळ्यात तरुण सदस्य आहे. त्यामुळे एक तरुण म्हणून तुमचं माझ्याकडेही लक्ष असावं." त्यांनी राहुल नार्वेकर यांचं माळवणकर यांच्याशी तुलना करत, "फडणवीसांनी तुम्हाला दिल्लीत पाठवायला हरकत नव्हती," असा हलकाफुलका टोमणा मारला.

फडणवीसांशी गोड संवादाची अपेक्षा:
संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शुभेच्छा दिल्या. "अमृताहून गोड नाम तुझे देवा" या अभंगाचा उल्लेख करत त्यांनी, "तुम्हीदेखील विरोधकांशी गोड संवाद साधाल, अशी अपेक्षा आहे," असे सांगितले. या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस खळखळून हसल्याचं पाहायला मिळालं.